
शिराळा प्रतिनिधी : “वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल,” असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
सामाजिक वनीकरण विभाग, शिराळा यांच्या वतीने जिल्हा योजना (जल व मृद्संधारण) अंतर्गत मौजे पुनवत येथे ‘अटल आनंदवन घनवन प्रकल्प’ राबविण्यात आला. या प्रकल्पांतर्गत ०.४० हेक्टर क्षेत्रात तब्बल १२ हजार रोपे लावण्याचा व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील, वनक्षेत्रपाल (सामाजिक वनीकरण) मनीषा उघाडे, सरपंच नाना शेळके, रघुनाथ शेळके, वनपाल, ग्रामसेवक अतिकिरे, सचिन पाटील, विशाल पाटील,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, “वाढते तापमान, बदलते हवामान आणि घटणारी वनसंपदा ही गंभीर चिंता आहे. अशा परिस्थितीत घनवन प्रकल्पासारखे उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी ठरतील. लोकसहभागातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहिली, तर शिराळा तालुका अधिक हिरवागार आणि जैवविविधतेने समृद्ध होईल.”
या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देत “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेला बळ देण्यात आले.

फोटो ओळ :- पुनवत येथे समाजिक वनिकारण विभागाच्या वतीने वृक्षारोपण करताना आमदार सत्यजित देशमुख, तहसीलदार शामला खोत पाटील आदी.










