
भिवंडी वृत्तसेवा : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या खूनप्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर सुरेखा न्यारे यांचे प्रकाश नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. पोलिस तपासानुसार, सुरेखा यांनी वारंवार लग्नासाठी आग्रह धरल्याने प्रकाश चिडला आणि कायमचा अडथळा दूर करण्यासाठी त्याने त्यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
खून केल्यानंतर कोणताही पुरावा शिल्लक राहू नये, यासाठी आरोपीने मृतदेह पोत्यात भरून स्वतःच्या कारच्या डिकीत ठेवला. त्यानंतर रात्रभर सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास करत तो थेट भिवंडी गाठला. मृतदेह समुद्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचा त्याचा डाव होता.
भिवंडीत पोहोचल्यानंतर आरोपीने आपल्या भाच्याला संपूर्ण घटना सांगत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितली. मात्र, मामाने खून केल्याचे समजताच घाबरलेल्या भाच्याने धाडस दाखवत तात्काळ नारपोली पोलिस ठाण्यात माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला कारसह ताब्यात घेतले आणि डिकीतून मृतदेह जप्त केला. या तत्पर कारवाईमुळे आरोपीचा पुरावे नष्ट करण्याचा कट उधळला असून, पुढील तपास सुरू आहे.









