प्रतिनिधी /उदय साळुंखे, अखिल भारतीय सरपंचांच्या वतीने एका पत्राद्वारे ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अडचणी आणि वाढत्या दबावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी एकीने काम करणे गरजेचे असताना, प्रशासनाकडून येणारे जादा ग्रामसभांचे आदेश आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे अधिकाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेचा उल्लेख पत्रात केला आहे, जिथे ग्रामसभेतील तणावामुळे ग्रामपंचायत अधिकारी श्री. पी. एन. पाटील यांना हृदयविकाराचा झटका येऊन प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर राज्यातील सरपंचांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायतीच्या संघटनांनी ग्रामसभांची संख्या कमी करावी, ग्रामसभेच्या वेळी पोलीस संरक्षण मिळावे आणि अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूर जिल्हा शाखेने या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.










