सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून आज सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वारणा धरणातील पाण्याची आवक वाढत असून धरण प्रशासनाने विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (28 जुलै) सायंकाळी 5.30 वाजल्यापासून वारणा नदीपात्रात एकूण 6,900 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.
धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, धरणाच्या वक्र दरवाजांद्वारे सुरू असलेला 3,700 क्युसेक विसर्ग वाढवून 5,500 क्युसेक करण्यात येणार आहे. तर विद्युतगृहातून 1,400 क्युसेक विसर्ग पूर्ववत सुरू राहणार आहे. त्यामुळे वारणा नदीपात्रातील एकूण विसर्ग 6,900 क्युसेक इतका असेल.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातील पाण्याची आवक आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात पुढील वाढ करण्यात येऊ शकते, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वाढलेल्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वारणा धरण व्यवस्थापनाने केले आहे.









