

वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी.
मलिकवाड प्रतिनिधी -ननदी, (ता.चिकोडी) येथील परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याचे नागरिकांतून निदर्शनास येत असून, वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलिकवाड येथील संजय मोरडे यांच्या मालकीचे KA.23.HA.3858 क्रमांकाचे वाहन चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास लंपास केले. मात्र, वाहन घेऊन गेल्यानंतर चोरट्यांनी त्यातील चाके काढून घेतली आणि वाहन एका ठिकाणी सोडून दिल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी आपली वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत का, याबाबत पोलिसांकडून तपास होणे आवश्यक आहे.
चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, ननदी परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी आणि भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
दरम्यान, वाहनधारकांनी रात्रीच्या वेळी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत. तसेच परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून रात्रीची गस्त वाढविण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.











