
विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी संभाजी चव्हाण रायबाग,
रायबाग : नागपंचमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना रायबाग शहरातील एका गरीब कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला.
शेतात कचरा काढण्याचे काम करत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने सत्यव्वा शिवानंद शिंगे (वय 43, रा. डॉ. बी. आर. आंबेडकर नगर, रायबाग) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपंचमीच्या दिवशीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सत्यव्वा शिंगे या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नेहमीप्रमाणे शेतात कचरा काढण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. शेतातील कचरा काढत असताना लपून बसलेल्या विषारी सापाने त्यांना दंश केला.
साप चावल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, विषाचा प्रभाव वाढल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या सत्यव्वा यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या मुलांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आईच्या निधनाने मुलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
नागपंचमीसारख्या सणाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने डॉ. बी. आर. आंबेडकर नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, ही घटना रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपंचमीच्या दिवशी सापाच्या दंशाने महिलेचा मृत्यू झाल्याने सणाच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली आहे.











