
यड्राव : तालुक्यात सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, तसेच स्मार्ट मीटरनंतर वाढलेल्या वीजबिलांच्या तक्रारींची सखोल चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.
याबाबत यड्राव विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात, जुने मीटर कार्यरत असताना ते बदलण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज वापरात लक्षणीय वाढ नसतानाही बिलाच्या रकमेत वाढ होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
ग्राहकांना त्यांचा सध्याचा पोस्टपेड मीटर कायम ठेवण्याचा पर्याय द्यावा, मीटर बदलण्याची प्रक्रिया पारदर्शक करावी, वाढीव किंवा चुकीच्या बिलांची तात्काळ दुरुस्ती करावी आणि मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना संपूर्ण माहिती द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे, अन्यथा सर्वसामान्य ग्राहकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन, निषेध मोर्चा व उपोषण करण्यात येईल, असा इशारा भारतीय दलित महासंघाने दिला आहे.











