कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी परिसरात चारित्र्याच्या संशयातून व कौटुंबिक वादातून पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. या प्रकरणी गणेश भगवान कदम (वय ३४, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव) याच्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिपाली गणेश कदम (वय ३२) हिला आरोपी गणेश कदम याने फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच कौटुंबिक कारणावरून वाद घालत धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात दिपाली यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनीही घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि करे करीत आहेत. घटनेमागील नेमके कारण, तसेच अन्य बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.











