चिकोडी तालुका प्रतिनिधी अमर माने,
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून मलिकवाड–दत्तवाड बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यापूर्वी दोन वेळा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांतील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापारी यांची मोठी गैरसोय झाली होती. आता पुन्हा एकदा पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दूधगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढतच राहिल्यास मलिकवाड–दत्तवाड बंधारा कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाऊ शकतो. त्यामुळे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावर गर्दी न करण्याचे, बंधाऱ्यावर अनावश्यक थांबू नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर महसूल, पोलीस व संबंधित विभागांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.











