सांगली प्रतिनिधी – चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (27 जुलै) दुपारी 4.30 वाजल्यापासून वारणा नदीपात्रात एकूण 3,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात असल्याची माहिती वारणा धरण व्यवस्थापन बी आर पाटील. उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.
धरणातून चारीही वक्र दरवाजाद्वारे 2,000 क्युसेक आणि विद्युत गृहातून 1,400 क्युसेक असा एकूण 3,400 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास अथवा पाण्याची आवक आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच जनावरे, शेतीची अवजारे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता बी.आर पाटील.यांनी केले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.









