
सांगली प्रतिनिधी – वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (27 जुलै) दुपारी 4.30 वाजता वारणा नदीपात्रात एकूण 3,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती वारणा धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
धरणातून वक्र दरवाजाद्वारे 2,000 क्युसेक आणि विद्युतगृहातून 1,400 क्युसेक असा एकूण 3,400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्यास अथवा पाण्याची आवक आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वारणा धरण व्यवस्थापनाने केले आहे.
दरम्यान, वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









