
मुंबई प्रतिनिधी – कासा, धुंदलवाडी परिसरात सकाळी १०.५८ वाजता जाणवले सौम्य धक्के; वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबईच्या शेजारील पालघर जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जिल्ह्यातील कासा आणि धुंदलवाडी परिसरात सकाळी सुमारे १० वाजून ५८ मिनिटांनी जमिनीला कंप जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ४ किलोमीटर खोलीवर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भूकंपाचा धक्का जाणवताच परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. कासा, धुंदलवाडी तसेच लगतच्या ग्रामीण भागात जमिनीच्या कंपनाचे हादरे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.
विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या भूकंपामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. आजच्या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.











