
ईश्वरपूर प्रतिनिधी – ईश्वरपूर शहरात आज सोमवारी (६ जुलै) भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भरवस्तीत मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सतत ठिकाण बदलत वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तब्बल सात तास शर्थीचे प्रयत्न केले. अखेर भूल देऊन बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
सोमवारी सकाळी शहरातील काही भागांत बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाने शोधमोहीम सुरू केली.
मात्र, बिबट्याने वारंवार ठिकाण बदलत वन विभागाच्या पथकाला चांगलीच झुंज दिली. सुमारे सात तास चाललेल्या या थरारक मोहिमेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य संधी साधून भूल देणारा डार्ट मारला. भूल लागल्यानंतर बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. बिबट्याला पकडल्यानंतर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, हा बिबट्या शहरात कसा आला, याचा शोध वन विभागाकडून घेतला जात असून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.











