विशाल क्रांती प्रतिनिधी अमर माने मलिकवाड, – महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसाचा थेट परिणाम बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यावर दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील प्रमुख कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत अवघ्या एका दिवसात तब्बल ५ फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यावर पुन्हा एकदा पुराचे सावट निर्माण झाले असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.
मलिकवाड परिसरातून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली असून नदीचे पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी कोरडे पडलेले नदीपात्र आता पूर्णपणे पाण्याखाली गेले असून नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे.
पाणीपातळी हळूहळू धोक्याच्या पातळीच्या दिशेने सरकत असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
कृष्णा आणि वेदगंगा नद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील धरण क्षेत्र व पाणलोट भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम या नद्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत नदीकाठच्या सखल भागांना पुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पुराच्या पाण्यात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या चिकोडी तालुक्यातील मलिकवाडसह कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठच्या गावांमध्ये परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.











