सांगली प्रतिनिधी – मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत चांगली ओल निर्माण झाली होती. त्यामुळे वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व भुईमूग पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. सुरुवातीला ओलावा पुरेसा असल्याने पिकांची उगवणही समाधानकारक झाली.
मात्र, पेरणीनंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक दिवसांपासून पावसाचा एकही जोरदार शिडकावा न झाल्याने जमिनीतील ओल कमी होत असून उगवलेली पिके करपू लागली आहेत.
पिके वाचवण्यासाठी शेतकरी विहिरी, बोअरवेल तसेच लघु व सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून शेतांना पाणी देत आहेत. अतिरिक्त खर्च करून पिके जिवंत ठेवण्याची कसरत सुरू असून पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून लवकरच दमदार पाऊस झाल्यासच खरीप हंगामाला दिलासा मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.











