
संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी :- नागर्दळे ते कोवाड या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. तरी अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून..सध्या पावसाळा सुरू असल्याने अपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल,खड्डे व पाणी साचत आहे.त्यामुळे दुचाकीस्वार व इतर वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण का झाले नाही? कामात एवढा विलंब का होत आहे,आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी कोणाची, असे गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवणे, पाणी निचरा व्यवस्थित करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य हटवणे तसेच अपूर्ण कामामुळे निर्माण झालेल्या धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे.
प्रमुख मागण्या :
1)नागर्दळे–कोवाड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
2)अपूर्ण कामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांची व धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी.
3)पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी योग्य निचरा व्यवस्था करावी.
4)रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व विलंबाची प्रशासकीय चौकशी करण्यात यावी.
5)संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांना कामाची निश्चित मुदत देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत.
नागरदळे–कोवाड हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे.त्यामुळे केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात तातडीने काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.











