ईश्वरपूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना शालेय वयातच लोकशाही प्रक्रियेचा आणि मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने येथील सद्गुरू आश्रमशाळेत ईव्हीएम प्रणालीच्या धर्तीवर मोबाईल ॲपच्या साहाय्याने शालेय विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक उत्साहात पार पडली. या अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांनी मतदार, उमेदवार, झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच पोलिस स्वयंसेवक अशा विविध भूमिका प्रभावीपणे पार पाडत लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जी.एस. व एल.आर.निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या निवडणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे मोबाईल ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले स्वतंत्र बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट.
प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणेच मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता.
या उपक्रमाचे नियोजन गेल्या आठ दिवसांपासून सुरू होते. उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी, माघार, निवडणूक चिन्हांचे वाटप, प्रचार, मतदान आणि मतमोजणी अशा सर्व टप्प्यांचे अत्यंत शिस्तबद्ध आणि वास्तवदर्शी नियोजन करण्यात आले होते. निवडणुकीदरम्यान पोलिसांची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
या उपक्रमास पत्रकार युवराज निकम,सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव, संचालक रणजित जाधव तसेच पालक आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
मुख्याध्यापक एस व्ही. शिंदे आष्पाक आत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाटील,रामचंद्र मदने, शुभम जाधव, विवेक यादव, बाळासाहेब कांबळे, वैभव मुळे यांचे सह सर्व शिक्षकांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.











