
संजय आगाशे,चंदगड (प्रतिनिधी): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने चंदगड तालुक्यात ऐतिहासिक पदयात्रा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ‘कुळवाडी हे कुणबीच’ या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या संदर्भाचा आधार घेत, बेळगाव आणि इतर गॅझेटमधील नोंदी शोधून चंदगड तालुक्यातील मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, रविवारी (दि. ६ सप्टेंबर २०२४) चंदगडमध्ये हजारो मराठा बांधव एकत्र आले. डोळगरवाडी फाटा ते पाटणे फाटा अशी भव्य पदयात्रा काढून त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकजूट दर्शवली. यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
१. ऐतिहासिक नोंदी: चंदगड तालुका पूर्वी बेळगाव जिल्ह्यात समाविष्ट असल्याने, सर्व ऐतिहासिक अभिलेख तिथेच आहेत. त्यामुळे मुंबई गॅझेटियर अंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील दफ्तर नोंदी तातडीने तपासाव्यात.
२. संस्थानांचे अभिलेख: चंदगड महाल पूर्वी कुरुंदवाड संस्थानाशी संलग्न असल्याने, त्यांच्याकडील कागदपत्रेही मराठा नोंदी शोधण्यासाठी तपासण्यात याव्यात.
३. कुळवाडी नोंदीचा समावेश: महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ म्हटले आहे, ज्याचा अर्थ कुळवाडी हा कुणबीच होतो. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी दाखले देताना कुळवाडी (कुलवाडी) या जातीचा समावेश करावा.
अनेक गरीब शेतकरी आत्महत्या, नोकरी-रोजगाराचा अभाव, आणि वाढत्या सामाजिक समस्यांमुळे मराठा समाज हलाखीचे जीवन जगत आहे. १९८२ पासून अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झालेला हा लढा, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चे आणि आता मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या SEBC आरक्षणापर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाज कुणबी असल्याचे सिद्ध करत सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे, ज्याला चंदगडच्या सकल मराठा समाजाने पूर्ण पाठिंबा दिला आहे.
जर वरील मागण्यांवर तातडीने कारवाई सुरू झाली नाही, तर येत्या काळात चंदगड तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
या निवेदनावर प्रा. दीपक रामकृष्ण पाटील, नितीन नारायण पाटील, कल्लाप्पा भोगण, विष्णू गावडे, शंकर मनमाडकर, पांडुरंग बेनके, शंकर कोले, चंद्रशेखर गावडे, राहुल कोंडेकर, संदीप भोगण आणि सुभाष पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










