
सांगली प्रतिनिधी – निसर्गाच्या लहरीपणाचे आणि बदलत्या हवामानाचे अनेक थरार आपण अनुभवतो आहे, मात्र सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी मल्लिकार्जुन रोड परिसरात अक्षय थोरात यांच्या शेतामध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाच्या बाबतीत निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याचा अधिकृत हंगाम संपून आता मुख्य पावसाळा (सप्टेंबर महिना) सुरू असताना, येथील एका आंब्याच्या झाडाला चक्क हिरवेगार आंबे लगडल्याचे समोर आले आहे. हा थक्क करणारा प्रकार सध्या परिसरात प्रचंड कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. हे झाड 22 वर्षांपूर्वीचे आहे.
सामान्यतः मार्च ते जून दरम्यान आंब्याचा हंगाम असतो आणि पावसाळा सुरू झाला की झाडांची फळधारणा थांबते. मात्र, येडेनिपाणी ता.वाळवा येथील या झाडावर सध्या मुख्य हंगामासारखेच लहान-मोठे आंबे घसाने लटकताना दिसत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून हा बदल पाहावयास मिळत आहेत. तीन वर्षांपूर्वी या झाडाला मार्च ते जून महिन्यामध्येच आंबे लागत होते.बदलत्या हवामानामुळे बसलेला ‘क्लायमेट शॉक’ किंवा ही ‘बारमासी’ जात असण्याची शक्यता कृषी जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात झाडावर रसरसलेले आंबे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि शेतकरी गर्दी करत आहेत. निसर्गाचा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.बदलत्या जागतिक तापमानवाढीचा हा एक संकेत असला, तरी निसर्गाची ही किमया प्रत्यक्ष पाहणे मात्र सर्वांसाठीच एक सुखद धक्का ठरत आहे.










