Edition

शाश्वत व समाजोपयोगी संशोधन काळाची गरज: डॉ. सर्फराज मुजावर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाई प्रतिनिधी – बदलत्या सामाजिक, पर्यावरणीय आणि तंत्रज्ञानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शाश्वत व समाजोपयोगी संशोधनाची नितांत गरज आहे. संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याचा थेट उपयोग समाजाच्या दैनंदिन गरजा, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सर्फराज मुजावर यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग व संशोधन व विकास कक्ष यांचे मार्फत ‘रिसर्च अँड लिटरेचर रिव्ह्यू’ या विषयांवरील आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) विनोद वीर हे होते. यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.सौ दिपाली पाटील, रिसर्च डायरेक्टर डॉ.संदीप वाटेगावकर, मराठी विभाग प्रमुख प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ.संग्राम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मुजावर पुढे म्हणाले, “सध्या संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, विद्यार्थी संशोधनाकडे करिअरचा एक महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून पाहत आहेत. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधनालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव राहिल्यामुळे अनेक कंपन्यांना आपले अस्तित्व टिकवता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलत्या संशोधन क्षेत्राचा ध्यास घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.” यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्सचा प्रभावी वापर तसेच परदेशातील संशोधन व करिअरच्या विविध संधीं, शोधनिबंध कसा लिहायचा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रा.(डॉ.) वीर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू आणि संशोधक वृत्तीने पाहण्याची गरज आहे. संशोधन क्षेत्रात प्रचंड संधी असून, पूर्वीच्या काळात साधनसामग्रीच्या मर्यादा होत्या; मात्र आज संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या अनुकूल वातावरणाचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून सातत्याने प्रयत्न करावेत आणि संशोधन क्षेत्रात आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये प्रा. दिपाली पाटील यांनी या कार्यशाळेचा उद्देश व महत्व स्पष्ट केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप वाटेगावकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.निकिता सुर्वे यांनी केले तर आभार डॉ. तृप्ती शिंदे यांनी मानले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजेश्वरी कामटे, प्रा. प्रियांका जाधव, डॉ.प्रवीण फरांदे, प्रा.ऋतुजा भोईटे, प्रा.पूजा जायगुडे, प्रा.सोमनाथ सानप, प्रा.अजित पांढरे, प्रा.मयुरी सावंत तसेच श्री.नवनाथ ठोंबरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अनिल सावंत, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, शुभम पिसाळ, शिवम सूर्यवंशी, आणि सचिन इथापे यांनी परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!