काठमांडू वृत्तसेवा : तिबेट सीमावर्ती भागातून आलेल्या पुराच्या पाण्याने नेपाळमध्ये मोठा विध्वंस केला आहे. भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०५ हिंदुस्थानींसह तब्बल ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांमध्ये २९१ परदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. परदेशी नागरिकांपैकी १०५ जण हिंदुस्थानी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुराच्या तडाख्यात अनेक गावे वाहून गेली असून रस्ते, पूल आणि महामार्गांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी नेपाळमधील अनेक प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतून आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून २५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रसुवा जिल्ह्यात नेपाळ पोलिसांचे २६ जवान आणि सशस्त्र पोलीस दलाचे सात जवान बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुरामुळे वीज क्षेत्रालाही मोठा फटका बसला असून रसुवागढी, चिलिमे, त्रिशुली-३ए, त्रिशुली-३बी हब २२० केव्ही सबस्टेशन, त्रिशुली आणि देवीघाट जलविद्युत केंद्रांसह किमान सहा प्रमुख प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.











