

कामेरी – प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे कामेरी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आणि शेतजमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या महामार्गाचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच रणजीत पाटील यांनी दिली.
कामेरी येथील महालक्ष्मी मंदिराची मोठी जत्रा दरवर्षी उत्साहात भरते. कामेरीसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे हे श्रद्धास्थान बाधित होण्याची शक्यता असल्याने भाविकांमध्येही नाराजी आहे.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या यापूर्वी झालेल्या दोन रुंदीकरणांमध्ये कामेरी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत. आता शक्तिपीठ महामार्ग या राष्ट्रीय महामार्गाला छेदणार असून, दोन्ही महामार्गांच्या जंक्शनमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन जाण्याची शक्यता असल्याचे सरपंच रणजीत पाटील यांनी सांगितले.
“अनेक शक्तिपीठांना जोडण्यासाठी महामार्ग काढला जात असताना कामेरीचे आमचे श्रद्धास्थानच उद्ध्वस्त होणार असेल, तर हा कसला विकास?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांची जमीन आणि महालक्ष्मी मंदिर वाचविण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी आणि भाविकांनी एकत्र येण्याचा निर्धार केला असून, २१ ऑगस्टच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रणजीत पाटील यांनी केले आहे.











