

ठाणे प्रतिनिधी – भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक दि. २६, २७ व २८ जुलै २०२६ रोजी रांची, झारखंड येथे झाली. या बैठकीत देशातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार कामगारांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
त्याच अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातही भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यातील विविध संलग्न कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे प्रामुख्याने पुढील मागण्या करण्यात आल्या.
👉ईएसआयसी (ESIC) वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
👉ईपीएफ (EPF) अंतर्गत किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹७,५०० प्रतिमहिना करण्यात यावी.
👉ईपीएफ वेतन मर्यादा ₹१५,००० वरून ₹३०,००० करण्यात यावी.
👉बोनस गणनेसाठी वेतन मर्यादा ₹७,००० वरून ₹१८,००० करण्यात यावी.
👉बोनस पात्रतेची वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
👉सर्व योजना (Scheme) कामगारांचे मानधन भरीव प्रमाणात वाढविण्यात यावे.
👉कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना ‘समान काम समान वेतन’ या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
👉श्रमसंहितांमधील कामगारविरोधी तरतुदी रद्द अथवा आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात.
👉बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील पाच दिवसांचा कामकाजाचा नियम तातडीने लागू करण्यात यावा.
👉ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा ₹२० लाखांवरून ₹४० लाख करण्यात यावी.
👉देशातील सर्व कामगारांसाठी किमान वेतन ₹३०,००० प्रतिमहिना निश्चित करण्यात यावे.
ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी ठाणे यांची भेट घेतली. सदरच्या शिष्टमंडळात जिल्हा सचिव श्री. विलास आंबेकर, मुंबई विभाग प्रमुख श्री. बापू दडस, श्री. रवी रमन ( वरिष्ठ नागरिक परिसंघ),
श्री रमेश नाईक उपाध्यक्ष (वितरण)वीज कामगार महासंघ, श्री. हर्षद कुटुंबळे (TJSB) , सौ. बेबीनंदा कांबळे ( घरेलू), श्री. प्रकाश खडिलकर (सहकारी बँक) , श्री. सासे ( मलेरिया फवारणी), श्री. डग्वेकर (राज्य परिवहन), श्री अमोल पाटमासे (वीज उद्योग) श्री. बाळासाहेब आवारे (महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ ) यांचा समावेश होता.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांना देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांना भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने आजच्या देशव्यापी धरणे आंदोलनाचे निवेदन सादर केले.











