
रेठरे धरण (ता. वाळवा) : रेठरे धरण येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यानिमित्त उद्योजक योगेश पाटील यांच्या वतीने भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करून सेवानिवृत्त झालेल्या आजी-माजी सैनिकांचा त्यांच्या पत्नीसह भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध शाळांचे विद्यार्थी, खोडशी (ता. कराड) येथील बँड पथक तसेच वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदुंगाच्या साथीने आजी-माजी सैनिकांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी सैनिकांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आजी-माजी सैनिक संघटनेच्या मैदानावर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, प्राथमिक आश्रमशाळा, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन येथे ध्वजारोहण करण्यात आले.
खोडशी येथील बँड पथकाच्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे केले. तसेच विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात वारकरी संप्रदायातील भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या साथीने मिरवणुकीत उत्साहाची भर घातली.
झेंडा चौक येथे सर्व शाळा एकत्र आल्यानंतर आयोजित कार्यक्रमात उद्योजक योगेश पाटील यांच्या वतीने आजी-माजी सैनिकांचा फेटा बांधून, सन्मानचिन्ह, फुलांचे रोप आणि हार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील, उपसरपंच यशवंत वाघमारे, उद्योजक योगेश पाटील, शहाजी पाटील, विजय देशमुख, मदन पाटील, राजेंद्र पाटील, उद्योजक दादासो पाटील,माजी सरपंच सुदाम पाटील , डी के पाटील , संजय घोरपडे, दीपक पाटील, तानाजी पाटील , प्रताप पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.











