
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित “स्वातंत्र्य गौरव जन जागरण अभियान” नुकतेच शिराळा येथील अंबामाता मंदिराच्या प्रांगणात अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले. २१ व्या शतकातही स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी लढणाऱ्या काँग्रेसच्या विचारांना शिराळा तालुक्यातून पुन्हा एकदा जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाला उपस्थितांची गर्दी पाहून शिराळा तालुक्यात काँग्रेस पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत आहे अशी चर्चा सुरू झाली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांच्या सत्काराने झाली. जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते बाबुरावदादा चरणकर यांचे नातू राजाभाऊ चरणकर आणि बीळाशी येथील स्वातंत्र्यसैनिक गणपतराव दादा पाटील यांचे नातू रवींद्र गायकवाड शिराळा यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजाभाऊ चरणकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांची सध्याची परवड मांडून स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसचा जाज्वल्य इतिहास उपस्थितांसमोर उलगडला.
प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष ॲड. रवि पाटील यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करताना राष्ट्रपिता,राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत न मानणाऱ्या जनसंघाची मनुस्मृति ही घटना म्हणून स्वीकारण्याची मागणी फेटाळून लावताना देशाला संविधान देण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने समता, बंधुता आणि न्यायावर आधारित संविधान दिले.आज ते संविधानच धोक्यात आहे.जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले, “वेगवेगळ्या रंगाच्या चिंद्यांनी बनलेली गोधडी जशी गोरगरीबांना ऊब देते, तशीच आमची विविधतेने नटलेली लोकशाही होती. ती गोधडी उसवून देश दोन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. पण राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे देशाला पुन्हा योग्य दिशा मिळत आहे.”
जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करताना “घर मोडकळीस आल्यावर माकडउड्या मारणाऱ्यांमुळे पक्षाला फरक पडत नाही” असे ठामपणे सांगितले. कार्यक्रमात मनोज देवकर यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर योगदानाचा परामर्श घेतला.त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन सोनवडे येथील माजी पोलीस पाटील आनंदा पाटील यांनी त्यांना मिठी मारली.हा क्षण संपूर्ण सभागृहासाठी भावनिक ठरला.
मागासवर्गीय सेलचे शिराळा तालुका अध्यक्ष म्हणून प्रदीप कांबळे, शेडगेवाडी यांना विक्रम सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या अभियानास प्रदेश सचिव नंदकुमार शेळके,अमित कांबळे,अजित ढोले,जिल्हा सरचिटणीस सचिन चव्हाण,अमित पारेकर, जि.म.बँक संचालक सलगरे,तालुका काँग्रेसचे तुकाराम चव्हाण, ॲड.पठाण,पोपट कदम,विकास साळुंखे,सुनील घोलप,राजेंद्र माने,बिळाशीचे बी. डी. रोकडे,बाबासाहेब धस,प्रदीप धस,शिराळ्यातील खलील मोमीन,दस्तगीर आत्तार यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.आभार सर्जेराव कोकाटे यांनी मांडले.











