शिराळा प्रतिनिधी – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरलेल्या चांदोली (वारणा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. आज (शुक्रवार) सकाळी 6 ते सायंकाळी 4 या कालावधीत धरण परिसरात 35 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा 85.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, धरणाची पाणीपातळी 622.00 मीटर झाली असून धरणात 29.48 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 22.60 टीएमसी म्हणजेच 82.13 टक्के आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील पाणीसाठा 79.41 टक्के होता. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत धरण परिसरात 1551 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आज सकाळच्या तुलनेत धरणाची पाणीपातळी 0.30 मीटरने, तर पाणीसाठ्यात 0.69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील साठा 85 टक्क्यांच्या पुढे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
सध्या स्पिलवेमधून 5500 क्यूसेक आणि जलविद्युत केंद्रातून (PWH) 1400 क्यूसेक असा एकूण 6900 क्यूसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कालव्यांमध्ये अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.
हवामान विभागाने पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.











