
नवी दिल्ली : देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टद्वारे केली आहे. या घडामोडीनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैक्षणिक प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता. तब्बल 26 दिवस उपोषण केल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्यानंतर वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीने मात्र शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली होती. पक्षाने आजच प्रधान यांना राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलन अधिक तीव्र झाले. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन काही ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला.
या घडामोडी सुरू असतानाच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर विद्यार्थी संघटना आणि आंदोलनकर्त्यांनी याला लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. देशभरातील विद्यार्थी आंदोलनाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, पुढील राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










