
ईश्वरपूर प्रतिनिधी – वाळवा तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वाळवा तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी ईश्वरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली.
विजयराव पाटील म्हणाले की, वाळवा तहसील कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे “वजन ठेवल्याशिवाय” होत नसल्याच्या अनेक तक्रारी आमदार जयंत पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून सदाभाऊ खोत यांनी वेगळाच अर्थ काढत राजकीय टीका केली, असा आरोप त्यांनी केला.
तहसील कार्यालयातील गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित होताच सदाभाऊ खोत यांना तो एवढा का लागला, असा सवाल उपस्थित करत विजयराव पाटील यांनी, “तहसील कार्यालयातील मलिदा त्यांच्यापर्यंत पोहोचतो का?” असा गंभीर आरोपही केला.
ते पुढे म्हणाले की, आमदार जयंत पाटील हे सातत्याने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्या विषयांवर भाष्य करण्याऐवजी सदाभाऊ खोत वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये करून मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देत विजयराव पाटील यांनी आरोप केला की, त्या आंदोलनातील विद्यार्थ्यांबाबतही सदाभाऊ खोत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. अशा विधानांमुळे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी वादग्रस्त वक्तव्ये करण्याचीच सदाभाऊ खोत यांची भूमिका असल्याचा आरोप करत, वाळवा तालुक्यातील जनता सुज्ञ असून योग्य वेळी त्यांना उत्तर देईल, असा इशाराही विजयराव पाटील यांनी दिला..










