

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,
गांधीनगर आणि वळवडे ता. करवीर परिसरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे स्थानिकांचे जीवन असह्य झाले आहे. कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीमुळे लहान मुले व वृद्ध आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.
या भीषण परिस्थितीमुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून, ती नागरिकांवर धावून जात असल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीला कठोर कारवाई करण्यासाठी एल्गार पुकारला आहे, आणि तात्काळ कचरा उचलण्याची तसेच कुत्र्यांचा नायनाट करण्याची मागणी केली आहे.
ही माहिती गांधीनगर उपशहर प्रमुख शिवसेना (उद्धव ठाकरे) मेघराज भिंगे आणि विभाग प्रमुख दीपक पपिटानी यांनी निदर्शनास आणून दिली.











