कोल्हापूर (प्रतिनिधी) : थकीत वीजबिल तात्काळ भरण्याची सूचना देण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बजरंग ज्ञानोबा खवले (वय 31, रा. बालिंगा, ता. करवीर) हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) येथे वायरमन म्हणून कार्यरत आहेत. दि. 20 जुलै 2026 रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास ते सहकारी शैलेश रमाकांत कांबळे यांच्यासह कळंबे तर्फे कळे येथील ग्राहक रविंद्र रंगराव कांबळे यांच्या घरी थकीत वीजबिल तातडीने भरण्याबाबत सांगण्यासाठी गेले होते.
यावेळी वीजबिल भरण्याचा आग्रह केल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे सहकारी तेथून देसाई गल्लीकडे गेले असता आरोपी पुन्हा त्यांच्या जवळ आला. आरोपीने फिर्यादीची गळपट्टी धरून हाताने मारहाण केली तसेच शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 402/2026 अन्वये बीएनएस कलम 132, 115(2), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल बांबळे (बकल क्र. 1157) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील (बकल क्र. 813) करीत आहेत.











