पंढरपूर वृत्तसेवा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थमंत्रीपद, एनडीएमध्ये प्रवेश आणि पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “आम्ही अर्थमंत्रीपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. अशी कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेमुळे मला दोन-तीन वेळा शपथ घेतल्यासारखे वाटले,” असे ते म्हणाले.
आषाढी वारीनिमित्त शक्तिपीठ महामार्गाविरोधातील ‘सद्बुद्धी दिंडी’मध्ये सहभागी होण्यासाठी पंढरपुरात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “एनडीएने आम्हाला कोणतेही निमंत्रण दिलेले नाही. आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळे एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.”
पक्षाच्या विलीनीकरणाबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “सध्या आमच्या पक्षात विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा सुरू नाहीत. सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी काही चर्चा एका टप्प्यापर्यंत झाल्या होत्या. मात्र सध्या तसा कोणताही विषय नाही,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. “मी कुणालाही भेटलो की त्याचे टोकाचे राजकीय अर्थ काढले जातात. अशा चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे सांगत त्यांनी सुरू असलेल्या सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम दिला.











