सांगली प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे आज आयोजित करण्यात आलेल्या “खून लो, लेकिन खेती मत लो” या अनोख्या रक्तदान आंदोलनाला शेतकरी, युवक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधत शेतकऱ्यांनी सुपीक शेती वाचविण्याची जोरदार मागणी केली.
“आज रक्तदान करतोय, उद्या रक्त सांडावे लागले तरी मागे हटणार नाही. लढाई कागदावरची असो किंवा रस्त्यावरची, आम्ही शेतकरी तयार आहोत,” अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह धोक्यात येणार असल्याचा आरोप केला.
यावेळी अनेक शेतकरी, युवक आणि नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. “आमचे रक्त घ्या, पण आमची शेती हिरावून घेऊ नका,” असा भावनिक संदेश देत सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
रक्तदानासारख्या विधायक उपक्रमातून आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपल्या लढ्याला वेगळे स्वरूप दिले. शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव मागे घेईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.












