सांगली प्रतिनिधी – राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला येलूर जिल्हा परिषद सदस्या सौ. देविका राजे घोरपडे यांनी कडाडून विरोध केला आहे. लोकांची मागणी नसताना सरकार हा महामार्ग लादत असून, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे ३० गावांसह वाळवा तालुक्यातील ११ गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
देविका राजे घोरपडे म्हणाल्या की, या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागायती व सुपीक जमिनी संपादित होणार आहेत. तसेच कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा धोका वाढण्याची शक्यता असून, स्थानिकांच्या हिताला बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे लोकांचे विनाकारण नुकसान होणार असल्याने शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध करण्यात येणार असून, महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेत आवाज उठवून विरोधाचा ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.











