सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीची अनेक कामे खोळंबली होती. शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांना मशागत, फवारणी, खत व्यवस्थापन आणि इतर कामे करता येत नव्हती.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा शेतात उतरले असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला तसेच इतर पिकांमध्ये तण काढणे, खत देणे, फवारणी आणि मशागतीची कामे सुरू झाली आहेत.
सध्या हवामान अनुकूल असल्याने रखडलेली शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात काम करत आहेत. पुढील काही दिवस पावसाने अशीच उघडीप दिल्यास शेतीची कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.











