
चांदोली प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या भात रोपलागणीची धांदल सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मुबलक पाणी साचले असून शेतकरी मोठ्या उत्साहाने भात लागवडीच्या कामात व्यस्त आहेत.
शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा भात पिकाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील काही शेतकरी धुळवाफेत भाताची पेरणी करतात, तर अनेक शेतकरी तरवे टाकून भाताची रोपे तयार करतात.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भातखाचरांमध्ये पाणी साचले आहे. या पाण्यात यांत्रिक अवजारे किंवा बैलांच्या साहाय्याने चिखलगुट्टा करून भाताच्या रोपांची लागण सुरू आहे. शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने या कामात सहभागी होत आहेत.
पावसाची संततधार, हिरव्यागार डोंगररांगा आणि पाण्याने भरलेली भातखाचरे यामुळे चांदोली परिसराला निसर्गरम्य रूप प्राप्त झाले आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे यंदा भाताचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.











