सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता वारणा नदीकाठच्या गावांना बसू लागला आहे. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून नदीकाठावरील शेती पिकांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द येथील साकव पुलावर पुराचे पाणी आल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील थेट संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना चिकुर्डे मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. कोल्हापूर तसेच वारणा औद्योगिक परिसराकडे जाणाऱ्या वाहनांनाही याचा फटका बसला आहे.
पुरामुळे वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून परिसरातील ओढे, नाले आणि वगळी तुडुंब भरून वाहत आहेत. नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे..
तरीसुद्धा या मार्गावरील प्रवासी पुलावरून पाणी वाहत असताना प्रवास करत असल्याचे सध्या चित्र आहे. तसेच नदीकाठावरील नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सतर्क राहावे, असेही त्यांनी सांगितले.
पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने वारणा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.











