सांगली प्रतिनिधी चांदोली परिसरात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी वीजेचे खांबही कोसळले आहेत.
या नुकसानीमुळे शनिवारी रात्रीपासून चांदोली परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. तब्बल २४ तास उलटूनही अनेक गावांमध्ये अद्याप वीज आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्क, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे.
वीज वितरण विभागाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सततचा पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पडलेली झाडे व तुटलेल्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











