सांगली प्रतिनिधी – तासगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गट निदेशक एस. डी. मुल्ला हे होते. प्रारंभी के. एस. कोळी यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मिलिंद सुतार यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६ या तिथीला झाला असल्याने शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार साजरा करण्याचे महत्त्व विशद केले. इंग्रजी तारीख आणि भारतीय पंचांगातील तिथी यामधील फरक लक्षात घेऊन छत्रपतींच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांनुसार समाज परिवर्तनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरिक कर्तव्य या पाच मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाकडे व्यापक दृष्टीने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. भविष्यात उद्योग क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी भारत अभियान संस्थेमार्फत आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एस. कोळी यांनी केले, तर एस. आय. मुजावर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











