शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी, सेलू : आपण डोळ्यांनी जे पाहातो त्याचा मनावर अधिक प्रभाव पडतो म्हणून चांगले तेच पाहिले पाहिजे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन त्याचे विचार कसे आहेत यावरून होते. आपला स्वभाव चांगला होण्यासाठी नेहमी चांगले चिंतन करावे. सकारात्मक विचारच सुखी जीवनाचे शिल्पकार असतात, असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले.
ग्रंथ दिंडीने भक्तीमय वातावरण
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता ग्रंथदिंडीने भक्तीमय वातावरणात झाली. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर ते कथा स्थळ ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरापर्यंत श्रीमद् भागवत ग्रंथ पालखीत ठेवून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. दिंडी मार्गावर पांडुरंग पाटणकर, डॉ. शरद ठाकर, माधव गव्हाणे, अनंत मोगल यांनी सुरेख रांगोळी काढली होती. भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, कीर्ती राऊत यांच्या संकल्पनेतून विठ्ठल-रूक्मीणी, श्रीकृष्ण -राधा, नृसिंह -हिरण्यकश्यपू यांचे सजीव देखावे स्नेहल जाधव, आरती कडवे, सिध्द आवटे, भाग्यश्री रत्नपारखी, अनया ढाकणे, स्वरा देशपांडे या विद्यार्थीनींनी साकार केले होते. ग्रंथ दिंडीवर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, सेलू, श्री ह.भ.प. धुंडामहाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्था, वालूर येथील वारकरी वेशभूषेतील, टाळ, विणा, मृदंग हाती असलेल्या विद्यार्थ्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
गुणवत्तेला प्राधान्य द्यावे
जीवन उद्धारासाठी ज्ञान संपादन करावे. गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. कोणतही ज्ञान टी.व्ही.वरील मालिकांद्वारे नाही तर मूळ ग्रंथाद्वारे मिळावावे. ज्या घरात महाभारताची कथा रोज वाचली जाते ते घर तीर्थ स्थानासम असते. त्या घरातील पापे नाहीशी होतात.
भागवत कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
सेलू शहरासह छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, परतूर, मंठा, पाटोदा येथील भाविक भक्तांनी सातही दिवस कथेचा लाभ घेतला. कथेस मोठ्या संख्येने उपस्थित रहात भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सातवे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी शुक्रवार ( दि.१९ ) रोजी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात गुंफले. पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की ” माणासाच्या कल्याणाच्या आड येणारा सर्वात मोठा शत्रू अहंकार आहे. त्यामुळे अहंकार दूर करायला हवा. जीवनात सत्यधर्माने वागावे. प्रेमाची किंमत जाणणाऱ्यावर प्रेम करावे. शुध्द अंतःकरणाचा माणूस अधिक समाधानी असतो.” असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे, इशिता अतुल कुलकर्णी यांनी भक्तीगीत गायले. श्रीमद् भागवतचे संहिता वाचन गोविंद जोशी यांनी केले. भाविकांच्या वतीने शंतनू महाराज पाठक, शुभदा गोळेगावर यांनी मनोगत व्यक्त केले. कथेचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी श्रीसोनामाय प्रतिष्ठान व कुलकर्णी परिवाराच्या वतीने प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन प्रकाश कुरूंदकर, अनिल रत्नपारखी यांनी केले. कथा यशस्वीतेसाठी विविध समित्यांतील सदस्यांनी पुढाकार घेतला.










