Edition

विद्यार्थ्यांसाठी शिस्त, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आमदार सौ.शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन; एकसंबा येथे विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने एकसंबा.

विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता मानवी मूल्ये, आदर्श गुण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्तम चारित्र्य आत्मसात करून आदर्श नागरिक बनावे, असे प्रतिपादन आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी केले.

एकसंबा येथील बीरेश्वर भवन येथे बुधवारी जोल्ले एज्युकेशन सोसायटीच्या शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच बसवज्योती कला, वाणिज्य व विज्ञान पूर्वमहाविद्यालयाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे उद्घाटन, विद्यार्थी स्वागत समारंभ आणि विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले ज्ञान, शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्तम वर्तन हाच त्यांच्या यशाचा भक्कम पाया असतो. शिक्षणाबरोबरच चांगले चारित्र्य आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थीच उद्याच्या समाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य घडविणारे घटक आहेत.”

कार्यक्रमात श्री. अण्णासाहेब जोल्ले आणि सौ. शशिकला जोल्ले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत कुलकर्णी, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, सुजाता कबाडे, लता वाळके, एम. एम. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जोल्ले समूह संस्थेचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हे जोल्ले एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले.

उद्योजक श्रीकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, स्पष्ट ध्येय आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करावे, तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच जीवनमूल्यांचे शिक्षणही द्यावे, असे मार्गदर्शन केले.

दिल्ली येथील भारतीय सहकारी संघ (एनसीयूआय) चे संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब जोल्ले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास आशाज्योती विशेष मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले, संचालिका सुजाता कबाडे, लता वाळके, संस्थेचे समन्वयक एम. एम. पाटील, प्राचार्य सी. पी. बन्नट्टी, रवी कुरबेट, ए. बी. अक्कोळे, मुख्याध्यापक आर. एम. हिरेमठ आदी उपस्थित होते.

प्राध्यापक एस. बी. माने यांनी स्वागत केले. शिक्षक व्ही. बी. खोत यांनी सूत्रसंचालन केले, तर एच. एस. माळगे यांनी आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!