पावसाच्या ओढीने संकटात सापडलेल्या खरीप पिकांना मिळणार जीवदान; हजारो शेतकऱ्यांना दिलासा.

शिराळा प्रतिनिधी : यंदा मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने शिराळा तालुक्यात खरीप हंगामातील उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर असताना आमदार सत्यजित देशमुख यांच्या तातडीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे २० ते २२ जून २०२६ या कालावधीत नदीपात्रातून शेतीसाठी पाणी उपसा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीन, मका, भात, भुईमूग आदी खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १९ जून) तहसील कार्यालय, शिराळा येथे पाणीटंचाई व शेतीसाठी पाणीपुरवठा या विषयावर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली.
आमदार सत्यजित देशमुख यांनी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत उभ्या पिकांना वाचवण्यासाठी तातडीने नदीपात्रातून पाणी उपसा सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शासनाने २० ते २२ जून या सलग तीन दिवसांसाठी शेतीसाठी पाणी उपशास मंजुरी दिली.
यासोबतच कृषी पंपांना आवश्यक वीजपुरवठा अखंडित ठेवण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उचलून उभ्या पिकांना वेळेत सिंचन करणे शक्य होणार आहे.
या निर्णयामुळे खरीप हंगामातील पिके वाचण्याची आशा निर्माण झाली असून शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.










