तारदाळ, प्रतिनिधी : कन्या व कुमार विद्या मंदिर, तारदाळ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य प्रियांका खोबरे म्हणाल्या, “शाळा म्हणजे सुसंस्कारीत पिढी घडवणारे केंद्र आहे. पहिल्याच दिवशी उत्साहाने शाळेत दाखल झालेली मुले पाहून आनंद होत आहे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पोवार होत्या.
प्रारंभी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोत सर यांनी केले. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुले, पुस्तके व गणवेश देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रियांका खोबरे, पत्रकार प्रमोद परीट, सूर्यकांत जाधव, माजी उपसरपंच बबलू कोळी तसेच सरपंच पल्लवी पोवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपसरपंच राणी माने, चंद्रकांत तांबवे, जगन्नाथ भोपळे, रेश्मा वड्ड, मुख्याध्यापक विलास कोळी, मुख्याध्यापक दत्तात्रय चोपडे तसेच दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सुतार यांनी केले. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात झाली.











