सांगली प्रतिनिधी – प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्या, रविवार (दि. १४ जून २०२६) रोजी कामेरी बाजारपेठेत शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यासाठी सुमारे चार ते पाच हजार शेतकरी व नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मेळाव्यास आमदार जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, कोल्हापूरचे आमदार सतीश उर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह विविध पक्षांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
आयोजकांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्यात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील पुढील आंदोलनाची दिशा आणि भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे..











