रायबाग प्रतिनिधी : तालुक्यातील सर्व गावांमध्ये १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत जॉब कार्ड मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, पात्र मजुरांनी या मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टी.पी.ईओ अरुण मचकन्नवर यांनी केले.
तालुक्यातील विविध गावांमध्ये शुक्रवारी आयोजित जॉब कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) अंतर्गत विकसित भारत हमी योजनेंतर्गत या जॉब कार्ड मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील पात्र मजुरांना नवीन जॉब कार्डचे वाटप करण्यात येत असून, निष्क्रिय कामगारांना पुन्हा सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे.
अरुण मचकन्नवर म्हणाले की, तालुक्यातील सर्व गावांमध्ये पात्र मजुरांना रोजगाराची कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. मजुरांना दररोज ३८२ रुपये मजुरी देण्यात येत असून, समान कामासाठी समान वेतनाची तरतूद आहे. तसेच पात्र मजुरांना १२५ दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भागातील कोणताही पात्र मजूर रोजगारापासून वंचित राहू नये, यासाठी जॉब कार्ड मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मजुरांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा. जॉब कार्ड व रोजगारासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आयईसी समन्वयक मुथुराज गडादी, अशोक यलगुडे आदी उपस्थित होते.











