
इस्लामपूर / प्रतिनिधी :
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ७०० रुपये दुसरा हप्ता तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केली आहे.
भागवत जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अडसाली ऊस लागवड, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच ट्रॅक्टर भाड्यात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे आर्थिक ताण वाढला आहे. रासायनिक खतांच्या गोणीचे दर सुमारे २,५०० ते २,७०० रुपयेपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे.
दुसरीकडे, राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यंदा समाधानकारक असल्याचा दावा त्यांनी केला. साखरेचा विक्री दर प्रति क्विंटल ४,५०० रुपये पेक्षा अधिक असून, किरकोळ बाजारात साखर ५० रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. तसेच बी-हेवी मोलॅसिसचा दर ६७ रुपये प्रति लिटर, हेवी मोलॅसिस ५५ रूपये प्रति लिटर आणि कच्च्या अल्कोहोलचा दर ६३ रुपये प्रति लिटर असल्यामुळे साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रति टन ७०० रुपये दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी भागवत जाधव यांनी केली आहे.









