सांगली प्रतिनिधी – नीट (NEET) परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. नव्याने परीक्षा पार पडली असून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नसल्याचा दावा विधान परिषद आ. सदाभाऊ खोत यांनी केला.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत बोलताना आ.खोत म्हणाले की, त्यांची प्रकृती खालावत असल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सरकारने योग्य निर्णय घेतला आहे.
नीट घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सखोल तपास करत असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास गतिमान पद्धतीने सुरू असताना विरोधकांकडून केवळ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी देशात सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून आंदोलनाच्या आडून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा राबवला जात आहे. मात्र देशातील जनता अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही, असा विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला..











