सांगली प्रतिनिधी – शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा डाव रचणाऱ्या सरकारने आता आमच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पाप केले आहे. हा कायदा घडवणाऱ्यांचा तालुका आहे, इथे हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा संतप्त आणि सज्जड दम शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे कॉ. धनाजी गुरव यांनी प्रशासनाला दिला आहे.
जुनेखेड येथे आयोजित महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जाहीर बैठकीत ते बोलत होते. दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या शांततापूर्ण रॅलीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसींचा या बैठकीत सर्वानुमते तीव्र निषेध करण्यात आला, तसेच या दडपशाहीविरोधात थेट उच्च न्यायालयात (हायकोर्ट) धाव घेण्याचा ऐतिहासिक निर्णय संघर्ष समितीने जाहीर केला आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी बोरगाव ते ऐतवडे खुर्द दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत भव्य मोटारसायकल रॅली काढली होती. कॉ. गुरव यांनी पोलीस प्रशासनाचा बुरखा फाडताना सांगितले की, “ती रॅली पूर्णपणे शांततेत, नियमांचे पालन करून पार पडली होती. कुठेही वाहतुकीला अडथळा झाला नाही की साधी कुणाची तक्रार नव्हती. असे असतानाही, सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी (SP) राजकीय दबावापोटी आमच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. हा सरळ-सरळ अन्नदात्याचा आवाज दाबण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा पोलीस प्रशासनाचा कुटील डाव आहे.
बैठकीत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करताना कॉ. धनाजी गुरव म्हणाले, “आम्हाला कायद्याचे धडे देण्याची गरज नाही. आम्हाला संविधानाने दिलेले हक्क आणि कायदे कसे पाळायचे हे चांगलेच ठाऊक आहे. आम्ही आमचे हक्क लढून मिळवले आहेत. जर पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. या खोट्या केसेस करणाऱ्या प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याला आम्ही न्यायालयात जाब विचारायला लावू.
सरकार आणि प्रशासनाच्या या दडपशाहीपुढे शेतकरी वर्ग अजिबात झुकणार नाही, उलट हा लढा आता अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी राजकीय सूडबुद्धीने दाखल केलेल्या या खोट्या गुन्ह्यांविरोधात संघर्ष समितीच्या वतीने तातडीने हायकोर्टात (उच्च न्यायालय) याचिका दाखल करण्यात येणार आहे.
या बैठकीला जुनेखेड व परिसरातील महामार्ग बाधित शेतकरी, कष्टकरी आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” आणि “शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.











