

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव
वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द शेतशिवारातील शेतकरी संतोष वामन भालेराव यांच्या सोयाबीन पिकात जनावरांनी धुडगूस घालून मोठे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.
शेतकरी संतोष वामन भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी दुपारी सुमारे ४ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत दत्ताराव जाधव यांच्या मालकीची दोन म्हशी, एक वगार व एक गाय अशी चार जनावरे त्यांच्या सोयाबीन पेरणी केलेल्या शेतात नुकसान होण्यासाठी जाणूनबुजून शेतात सोडले. या जनावरांनी पिकाची मोठ्या प्रमाणात तुडवाट केल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन पीक पूर्णतः नुकसानग्रस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच बियाणे, खते, मशागत व इतर शेती खर्चात वाढ झाल्याने या नुकसानीमुळे संतोष भालेराव यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी लागणारा बियाणे, खत, मशागत व मजुरीचा खर्च संबंधित जनावरांच्या मालकाकडून वसूल करून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संतोष वामन भालेराव तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.











