सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन नदीकाठावरील अनेक शेतांमध्ये शिरले असून शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक बंधारेही पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तीव्र विरोध दर्शविला आहे. “अवघ्या चार दिवसांच्या पावसाने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात अशाच प्रकारे सलग पाऊस पडला आणि शक्तिपीठ महामार्ग उभारण्यात आला, तर पाण्याचा नैसर्गिक निचरा अडेल आणि संपूर्ण गावांवर महापुराचे संकट कोसळेल,” अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आधीच अल्पभूधारक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यात शेतीच्या जमिनी गेल्यास उपजीविकेचे एकमेव साधन हिरावले जाईल. “आम्हाला शक्तिपीठ नको, आमच्या जमिनी वाचवा. शेती राहिली तरच आमचे आयुष्य उभे राहील. शक्तिपीठामुळे आमचा कोणताही फायदा होणार नाही, उलट आमची शेती आणि गावे धोक्यात येतील,” अशी कळकळीची मागणी त्यांनी शासनाकडे केली.
सध्या वारणा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून आणखी काही दिवस जोरदार पाऊस कायम राहिल्यास नदीकाठच्या गावांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय तातडीने रद्द करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि गावांचे संरक्षण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत.

बाइट.
धनाजी पाटील.नागरीक
शेतकरी ऐतवडे खुर्द .











