
इचलकरंजी प्रतिनिधी – दि. ७ जुलै : केंद्र सरकारने सुरू केलेल्या E20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलमुळे वाहनचालकांना विविध तांत्रिक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा दावा करत, जनरल लेबर युनियन, इचलकरंजी यांच्या वतीने पूर्वीप्रमाणे इथेनॉलमुक्त पेट्रोल उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी, इचलकरंजी यांना सोमवारी सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात इथेनॉल हवेतून आर्द्रता शोषून घेत असल्याने पेट्रोलमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड, इंजिन जाम होणे तसेच वाहने बंद पडण्याच्या घटना वाढत असून त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे.
याशिवाय, E20 पेट्रोल लागू करताना ग्राहकांना इथेनॉलयुक्त किंवा इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या हिताचा विचार करून पूर्वीप्रमाणे इथेनॉलमुक्त पेट्रोल पुन्हा सुरू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जनरल लेबर युनियनचे अध्यक्ष कॉ. आनंद गुरव यांच्यासह प्रविण केर्ले , रमेश खोत, रुपेश कांबळे, सुनील खोत, सुधीर अतिग्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाची प्रत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.












